Nag panchami katha : नागपंचमीची कहाणी

Nag panchami katha : नागपंचमीची कहाणी

Kathaye ( कथाएँ ) नागपंचमीची कहाणी

कहाणी – 1 – नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली.

आपलं वारूळ पाहू लागली.तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला.तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.

तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली.

मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस ? तुझे आई-बाप कोठे आहेत ? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली.ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले.

ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही.तिने मुलीला सारी हकिकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले.ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली.तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली.सगळयांना आनंद झाला.

तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेंव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला.

जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

कहाणी – 2 – नागपंचमीची ब्राह्मणाची कहाणी

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Read more: